

उरुळी कांचन: हवेली तालुक्यातील पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखाना या संस्थाचे प्रश्न सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाकडून सुटत नसल्याने या संस्थांवर वर्चस्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोघे भाऊ संस्थेचे पदाधिकारी आणि समर्थकांसह सत्तेतील आणखी एक भागीदार पक्षाचा 'धनुष्यबाण' उचलण्याच्या तयारीत असल्याने हवेलीत राष्ट्रवादीत भूकंप घडणार असल्याने चर्चेला उधाण फुटले आहे.
पुणे बाजार समिती व यशवंत कारखान्यावर अनुक्रमे दोन व दीड दशकांची प्रशासकीय राजवट संपल्यानंतर साखर कारखान्याच्या जमीन विक्रीचा प्रश्न सुटल्याने या संस्थाचे तालुक्याच्या सहकारातील महत्त्व अधोरेखित झाले आहे. आता या संस्थांचे हे यश सत्ताधारी पक्षातील श्रेयाचे केंद्रबिंदू ठरू लागले असून, हा श्रेयवाद संस्थाच्या अस्तित्वाचा गळा घोटू लागला आहे.
साखर कारखाना सुरू करण्याचे सर्व प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या 'निशाना'वर आल्याने या संस्थांच्या अस्तित्वाचे पतन होऊ लागल्याची चर्चा आहे. अशातच या संस्थांवरील राजकीय वर्चस्व असलेल्या दोन्ही भावंडांच्या प्रयत्नांना एका सत्ताधारी पक्षाकडून 'खो' तर सत्ताधारी राष्ट्रवादीकडून अपेक्षित ताकद मिळत नसल्याने या पदाधिकाऱ्यांनी सत्तेचा तिसरा भिडू 'धनुष्यबाणा'शी हातमिळवणी चालू केली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर ताकद मिळेना
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेला यशवंत कारखान्याचा प्रश्न पुणे बाजार समितीमार्फत सोडवून देण्याचा शब्द तालुक्याला दिला होता. त्यानुसार त्यांनी या भावांना मोठी मदत केली होती. मात्र, त्यांच्या पश्चात राज्य मंत्रिमंडळाचा ठराव मंजूर होऊन कायदेशीर त्रुटी काढल्या गेल्याने कारखान्याने पुणे बाजार समितीला ४९.१८ एकर जमीन पहिले खरेदी खत देऊनही संस्था पणन विभागाच्या स्थगिती निर्णयावर अडकून पडली आहे. अजित पवार यांच्यानंतर हा प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रयत्नांना यश मिळत नसल्याची चर्चा आहे.
बाजार समितीच्या उपसभापतिपदावरून वाद वाढला
पुणे बाजार समितीच्या उपसभापतिपदाची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीवरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. भाजपच्या बड्या नेत्याने या पदावर आपली मर्जी राखावी म्हणून थेट विचारणा केली असल्याची चर्चा आहे; मात्र भाजपच्या मागणीला नकार मिळाल्याने या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरात वाद घडला असल्याची चर्चा असल्याने आता हा संघर्ष कुठला टोकाला जाणार याची चर्चा रंगू लागली आहे.