

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील खरीप भात पिकाची कापणी सुमारे 90 टक्के पूर्ण झालेली असून, यावर्षी मावळ तालुक्यातील भात पिकाला अतिशय चांगला उतारा मिळत असल्याचे तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले.
यावर्षी मावळ तालुक्यातील बर्याच शेतकर्यांनी अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने भात लावगडी केलेल्या होत्या. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने भाताचे पीक सर्वत्र चांगले आले आहे. यावर्षी मावळ तालुक्यात सुमारे 125 टक्के पाऊस पडला आहे.
हा भात पिकाला पोषक असल्याने यंदा भात पिक चांगलेच आलेले आहे. यावर्षी भात पिकाला काही भागात हेक्टरी उत्पन्न 50 ते 55 क्विंटल उतारा मिळलेला आहे. यंदा विक्रमी उतारा मिळत असल्याने शेतकरीवर्ग चागंलाच समाधानी आहे.
यावर्षी मावळ तालुक्यातील भात पिकाला अतिशय चांगला उतारा मिळत असल्याने आणि तालुक्यातील सर्व शेती विकास सोसायट्या 24 रुपये किलो या हमीभावाने भात खरेदी करणार असल्याने शेतकर्यांना अच्छे दिन आले आहेत.
मावळ तालुका हा खरीप भातपिक असलेला महत्वाचा तालुका असून, या तालुक्यात यावर्षी सुमारे 13 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर खरीप भातपिक घेतले होते. यावर्षी मावळ तालुक्यात खरीप भात पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर अतिशय चागंला पाऊस पडल्याने भातपीक अतिशय चांगले आले आहे.
– दत्तात्रय पडवळ, कृषी अधिकारी, मावळ
भात पिकाला मिळालेला हेक्टरी उतारा
50 ते 55 क्विंटल
तालुक्यात घेतलेले पीक
13 हजार 500 हेक्टर
शेती विकास सोसायट्यांचा हमी भाव
24 रुपये किलो
या वर्षी पडलेला पाऊस
125 टक्के