

पुणे: केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, तिरंगामय वातावरण व्हावे, या उद्देशाने 15 ऑगस्ट 2025 पर्यंत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे, सर्व संबंधित विभागाने समन्वय साधून हे अभियान यशस्वी करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी ‘हर घर तिरंगा अभियाना’अंतर्गत 2 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्याबाबत आढावा घेतला. यावेळी सर्व संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
त्यावेळी कदम म्हणाल्या, जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून ’हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या वर्षीचे अभियान तीन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दुसरा टप्पा 9 ते 12 ऑगस्ट 2025, तर तिसरा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व संबंधित विभागाने अभियानाची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिली.