पुणे : पुढारी वृत्तसेवा : गोखले इन्स्टिट्यूट म्हणजे सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीच्या अंतर्गत 1930 मध्ये स्थापन झालेले शैक्षणिक उपक्रम केंद्र आहे. त्याला स्वातंत्र्यानंतर स्वायत्त विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली. देशभरात आर्थिक धोरण ठरवण्याचे कार्य या विद्यापीठाच्या माध्यमातून चालत होते. मात्र, डॉ. अजित रानडे कुलगुरू झाल्यापासून संस्थेत सुरू असलेल्या गोरखधंद्यात आणखी एक रथ सामील आहे. या बाबतचा खुलासा करणारे पुरावे नुकतेच हाती आले आहेत.
दामोदर साहू हे सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या कारकिर्दीत सचिव मिलिंद देशमुख यांच्या गैरकारभाराचा रथ सुसाट वेगाने दौडत आहे. त्यापैकी शासकीय दस्तऐवजावर खोट्या सह्या करून महसूल विभागाची फसवणूक करून सोळा एकर जमीन गडप करणारे प्रकरण न्यायालयात न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. तरीही साहू यांनी देशमुखांवर काहीच कार्यवाही केली नाही. कारण साहू यांनी स्वतःच्या मुलाला संस्थेचे आजीवन सदस्य करण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. प्रभाष रथ यांची नियुक्त आधीच केली होती.
रथ यांना माहीत होते कुलगुरू रानडेंचे गुपित
डॉ. डॉ. रानडे यांचे कुलगुरू पदाचे सर्व गुपित डॉ. प्रभाष रथ यांना कुलसचिव असल्याने ठाऊक होते. त्यामुळे 'तेरी भी चूप मेरी भी चूप' याप्रमाणे कारभार सुरू ठेवला. माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीत खुद्द सुनीता प्रभाष रथ (त्रिपाठी) यांनी परिचारिका पदाची परीक्षा दिली नसल्याची कबुली दिली आहे. डॉ. अजित रानडे यांनी यापूर्वी महिला प्राध्यापक डॉ.मुखोपाध्याय यांची पाठराखण करून शासकीय वेतन निधीचा गैरवापर केला. नंतर 'पुढारी'त वृत्त प्रसिध्द होताच हलकल्लोळ झाल्याने मुखोपाध्याय यांचा राजीनामा घेतला.
कोण आहेत हे रथ?
डॉ. रथ हे सुरुवातीला अध्यक्ष साहु यांची हेरगिरी करणारे कर्मचारी होते. नंतर ते गोखले इन्स्टिट्यूटचे कुलसचिव झाले. या पदाचा गैरवापर करून गोखले इन्स्टिट्यूटच्या वसतिगृहात परिचारिका म्हणून रथ यांनी लगेच त्यांच्या पत्नीला 2017 मध्ये नेमणूक दिली. परिचारिका हे पद आरोग्याशी संबंधित आहे. इथे परिचारिकेचे काय काम ? मात्र, परिचारिका प्रशिक्षण घेतल्याचे सांगून परीक्षा न देता नियुक्त केल्याची कबुली देणारे सुनीता रथ (त्रिपाठी) यांचे पत्र हाती आले आहे.
मोठ्या उद्योजकांची नावे व्यवस्थापन मंडळात आली पण…
आता हे नवे प्रकरण उघडकीस आले. परिचारिका पदासाठी पात्र नसताना नेमणूक केल्याचे उघडकीस आले. यावरून रानडे आणि देशमुख यांनी पदाचा गैरवापर करून संस्थेचे काय काय केले याचा अंदाज नाही. दामोदर साहू हे सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी सर्व नैतिक जबाबदारी फेटाळली म्हणून अध्यक्ष, सचिव आणि कुलगुरू यांची गोरखधंदे करणारी टोळी संस्थेच्या पदावर निर्माण झाली. त्यात पुन्हा किर्लोस्कर पंप उद्योगाचे संजय किर्लोस्कर, आनंद देशपांडे अशा व्यक्तींना इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापन मंडळावर सदस्य केले आहे. मात्र, धर्मादाय आयुक्तांकडे बदलअर्जात ही नावे दाखल केली नाहीत. त्यामुळे सचिव मिलिंद देशमुख हे किती धूर्त आणि पाताळयंत्री आहेत, याबाबत विश्वस्त चर्चा करीत आहेत.
गंगाधर साहू, रमाकांत लेंका हे दामोदर साहू यांच्या गोरखधंद्याला विरोध करतात म्हणून बदलअर्जात त्यांची नावे दाखल केली नाही; कारण प्रभाष रथ हे ओडिशातील असून, साहू यांचे हेर असल्याची चर्चा संस्थेत आहे. त्यामुळे दामोदर साहू, मिलिंद देशमुख हे डॉ. रानडे यांच्यासोबत संस्थेला मात्र कलंकित करीत आहेत. हे थांबवले पाहिजे म्हणून धर्मादाय आयुक्त यांच्या कोर्टात शीघ— गतीने प्रक्रिया सुरू आहे. -प्रवीणकुमार राऊत, हरकतदार.