पिंपरी : बिजलीनगर रेल्वे पुलाजवळील कचरा अखेर हटविला
आकुर्डी : 'बिजलीनगरचा पादचारी पूल असुरक्षित' या मथळ्याखालील बातमी दैनिक 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेऊन आरोग्य विभागाने रेल्वे पादचारी पुलाजवळील कचरा उचलला आहे. पादचारी पुलावर कचरा टाकत असल्याने येथे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच हा रेल्वे ब्रीज आहे की, डंपिंग ग्राऊंड? हा प्रश्नही पडत होता. येथील राडारोडा, कचरा उचलण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती. या संदर्भातील वृत्त दैनिक 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर राडारोडा व कचरा आरोग्य विभागातील कर्मचार्यांनी हटविला आहे. परिसरात कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्य विभागाचे मुकादम लक्ष्मण साळवे यांनी दिला आहे.
या वेळी आरोग्य विभागातील कर्मचार्यांनी कचरा उचलण्यासाठी आम्हा दोनच कर्मचार्यांवर याचा ताण येत असल्याने त्यांनी मनुष्यबळ वाढविण्याची मागणी केली आहे. पादचारी पुलावर रात्रीच्या वेळी छेळछाड तसेच चोर्यामार्या होत असल्याने रात्रीची गस्त घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. रात्री मद्यपींचा वावर येथे असल्याने तसेच प्रकाश व्यवस्थेअभावी येथील पादचारी रेल्वे पुलावरून जाण्यास महिला घाबरत आहेत.