

शिक्रापूर (ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : जातेगाव बुद्रुक येथील एका शेतात ऊसतोड सुरू असताना कामगारांना उसाच्या शेतात बिबट्याची चार पिले आढळून आली. वन विभाग तसेच निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या सभासदांनी सदर ठिकाणी धाव घेत पिलांना सुरक्षित स्थळी हलविले. जातेगाव बुद्रुक येथील सुरेश इंगवले यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना ऊसतोड कामगारांना अचानकपणे बिबट्याची पिले दिसून आली. याबाबतची माहिती शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळताच वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख, संचालक दत्ता कवाद, अमोल कुसाळकर, पूजा बांगर यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली.
बिबट्याची चार पिले मृत झाल्याचे दिसून आले. या वेळी सरपंच किशोर खळदकर, उपसरपंच गणेश उमाप, ग्रामपंचायताचे राहुल पवार, सामाजिक कार्यकर्ते अनिल इंगवले, राहुल क्षीरसागर, सुनील वारे, रतिकांत उमाप, सुरेश इंगवले आदी उपस्थित होते. दरम्यान, या वेळी वनरक्षक तसेच निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या सभासदांनी बिबट्याच्या तीन बछड्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवले. मृत बछड्याला शवविच्छेदनासह पुढील कार्यवाहीसाठी शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालय येथे पाठवून दिले. पिले खूप लहान असून, रात्रीच्या सुमारास त्या पिलांची आई असलेली बिबट मादी पिलांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करेल, असे वनरक्षक बबन दहातोंडे यांनी सांगितले.
ऊसतोडीमुळे बिबट्यांचे अस्तित्व धोक्यात
शिरूर तालुक्यात अनेक ठिकाणी उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्यांना निवारा भेटत आहे. त्याच ठिकाणी भक्ष्यदेखील मिळत असते. सध्या बिबट्यांचा प्रजननकाळ असताना ऊसतोडही सुरू आहे, त्यामुळे बिबट्यांची पिले आढळून येत आहेत. तसेच, ऊसतोडीमुळे बिबट्यांचे अस्तित्वही धोक्यात येत असल्याचे वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख यांनी सांगितले.