राजगुरूनगर (पुणे), पुढारी वृत्तसेवा : वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने ज्यांची दखल घेतली असे रानमळा पॅटर्नचे प्रवर्तक,माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य खेड तालुक्यातील आदर्श गाव रानमळाचे माजी आदर्श सरपंच, जिल्हा परिषद शाळेचे माजी आदर्श शिक्षक, पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संस्थापक व निसर्ग मित्र, प्रखर पर्यावरणप्रेमी, निसर्ग सखा व अखंड मानवतेचा झरा आणि विद्यार्थ्यांना घडविण्यात हाडाचा शिस्तबध्द कर्मकठोर आदर्श शिक्षक, जाणीव जागृती मंच सदस्य, खेड तालुक्यातील एक आदर्श उत्तुंग, धुरंदर, मुत्सद्दी, कलात्मक, व्यक्तिमत्व पी. टी. गुरुजी उर्फ पोपटराव तुकाराम शिंदे,(वय ८९) वर्षे, यांचे दिल्ली येथे सोमवारी (दि २२) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
राजगुरूनगर शहर,रानमळा,कडुस परिसर आणि तालुक्यात निधनाची बातमी सायंकाळी समजल्याने अनेकांना धक्का बसला. वृक्ष लागवड व जतन करण्यासाठी केलेल्या कामाबद्दल पी. टी. शिंदे यांना दिल्ली येथील एका संस्थेच्या वतीने विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते सोमवारी दिल्ली येथे गेले होते. पुरस्कार स्वीकारला आणि खुर्चीत पुन्हा बसल्यावर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यु झाला असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या मागे पंचायत समितीच्या माजी सदस्या मंगल शिंदे, मुलगा मिलिंद, दोन मुली तसेच सुन ,नातवंडे असा परिवार आहे.
रानमळा गावाला पुरस्कार
महाराष्ट्र राज्याचा संत तुकाराम महाराज वनश्री प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पी टी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रानमळा गावाला प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी वनविभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मार्गदर्शन केले. पुण्यातील यशदा या संस्थेचे ते मानद व्याख्याते होते. राज्य वनविभागाने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून पी टी शिंदे यांची पद्मश्री पुरस्कारासाठी केंद्राकडे शिफारस केली आहे.