पुणे : पुढारी वृत्तसेवा
दिवंगत लेखकाच्या पुस्तकाची प्रवेशिका स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड.मय पुरस्कार स्पर्धेसाठी अपात्र समजण्यात येईल, असा अजब नियम शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमूद केला आहे. विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना मरणोत्तर प्रतिष्ठेचे पुरस्कार दिले जातात. मग, आपल्या लेखणीने समाजमन बदलणार्या लेखकांना यापासून दूर का ठेवले जाते? अशी नाराजी व्यक्त करत हा नियम लेखकांवर अन्यायकारक असल्याचे प्रकाशकांनी म्हटले आहे.
राज्य शासनाच्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कार योजनेअंतर्गत 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 कालावधीत प्रसिद्ध झालेल्या प्रथम आवृत्ती पुस्तकांना निवडीअंती शासनाकडून पुरस्कार दिले जातात. त्यात प्रौढ वाड्मय, बाल वाड्.मय, प्रथम प्रकाशन आणि सरफोजीराजे भोसले बृहन महाराष्ट्र पुरस्कार यांचा समावेश आहे.
31 जानेवारी 2022 ही पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत देण्यात आली. या योजनेअंतर्गत दिल्या जाणा-या पुरस्कारांसाठी राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने एक नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यात दिवंगत लेखकाच्या पुस्तकाची प्रवेशिका या स्पर्धेसाठी अपात्र समजण्यात येईल. दिवंगत लेखकाच्या पुस्तकाची प्रवेशिका प्रकाशक, नातेवाईक वा इतर अन्य कुणालाही स्पर्धेमध्ये सादर करता येणार नाही. तसे निदर्शनास आल्यास ही प्रवेशिका व पुस्तक स्पर्धेसाठी अपात्र ठरविले जाईल, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
कोरोनामुळे भयावह परिस्थिती आहे. सर्व क्षेत्रातील कर्तबगारांना मरणोत्तर पुरस्कार दिले जात असताना लेखकांना यापासून दूर का ठेवावे. आमच्या परिवारातील काही महत्त्वाचे लेखक या काळात निवर्तले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पुस्तकांच्या पहिल्या आवृत्या प्रकाशित झाल्या. या आणि अशा अनेक लेखकांसाठी हा नियम अन्यायकारक आहे.
– घनश्याम पाटील, प्रकाशकएखादे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर तो दिवंगत झाला तर त्यात दोष लेखकाचा नाही ना? स्पर्धेसाठी पुस्तक सादरच करता येणार नाही हे अत्यंत चुकीचेच आहे. अशी अडवणूक करणे हे त्या लेखकावर अन्याय करण्यासारखेच आहे. आपण मरणोत्तर अनेकांना पुरस्कार देतो. ते गेले म्हणून त्यांना डावलता येणार नाही. शासनाचा हा नियम बदलण्यासाठी मराठी प्रकाशक परिषद नक्कीच प्रयत्न करेल.
– अरविंद पाटकर, सदस्य, मराठी प्रकाशक परिषद