

भवानीनगर: ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मानाच्या अश्वाचे पहिले गोल रिंगण बेलवाडी (ता इंदापूर) येथे शनिवारी (दि २८ ) सकाळी भक्तिमय वातावरणामध्ये उत्साहात पार पडले.
शनिवारी सकाळी साडेसात वाजता ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात सुरुवातीला नगारखाना नंतर सर्व दिंड्या व पालखी सोहळा रिंगण स्थळामध्ये दाखल झाला सुरुवातीला अक्षय मचाले यांच्या मेंढ्यांचे रिंगण पार पडले त्यानंतर भगव्या पताका घेतलेले वारकरी डोक्यावर हंडा व तुळस घेतलेल्या महिला वारकऱ्यांनी व विनेकऱ्यांनी पालखी भोवती प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर पालखीचे मानाचे अश्व व मोहिते पाटलांचे अश्व रिंगणामध्ये दाखल झाले. (Latest Pune News)
अश्वांचे पूजन क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. पालखीच्या अश्वांच्या रिंगणाला सुरुवात झाली ज्ञानोबा तुकारामच्या जयघोष मध्ये मानाच्या अश्वाने पालखीला तीन प्रदक्षिणा पूर्ण करून पालखीचे दर्शन घेतले व डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा पार पडला.
अश्वाचा रिंगण सोहळा पार पडल्यानंतर अश्वाची चरणधुली घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा नेत्रदीपक रिंगण सोहळा सुमारे एक तासापर्यंत चालला होता. पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण पार पडल्यानंतर पालखी बेलवाडी येथील मारुती मंदिरामध्ये खांद्यावरून नेण्यात आली येथील मारुती मंदिरामध्ये पंचक्रोशीतील भाविकांनी पालखीच्या दर्शनाचा लाभ घेतला रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.
दरम्यान सणसर येथील मुक्कामानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने शनिवारी सकाळी सात वाजता सणसर येथून निमगाव केतकी येथील मुक्कामाकडे प्रस्थान ठेवले. त्यावेळी जाचकवस्ती खाराओढा येथून पालखी सोहळा बेलवाडी येथे पोहोचला. पालखी सोहळा बेलवाडी येथे आल्यानंतर येथील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
पालखी सोहळ्याने रिंगण स्थळाकडे प्रस्थान केले. पालखी सोहळा रिंगण परिसरात पोहोचल्यानंतर क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे तहसीलदार जीवन कांबळे नेचर डिलाइट उद्योग समूहाचे अध्यक्ष अर्जुन देसाई कांतीलाल जामदार छत्रपती कारखान्याचे संचालक शरद जामदार सरपंच मयुरी जामदार केशव नगरे राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर विजय पवार तुषार सपकाळ संजय पवार संजय मुळीक अनिल दुगड व ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले.
सूत्रसंचालन महादेव गायकवाड यांनी केले. पालखी सोहळा बेलवाडी गावामध्ये सकाळच्या न्याहारीसाठी विसावल्या नंतर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या सकाळच्या न्याहरीची व्यवस्था केली होती. विसाव्यानंतर पालखी सोहळ्याने निमगाव केतकी मुक्कामाकडे प्रस्थान केले.