भोसरी : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार्या महाराष्ट्रभूषण कार्यक्रमात 12 निष्पाप लोकांना उष्माघातामुळे आपला जीव गमवावा लागला. याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून कार्यक्रमाच्या आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. तरीही भर उन्हात हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. उन्हापासून बचाव करण्यासाठीची कोणतीच उपाययोजना केलेली नव्हती. परिणामी 12 लोकांना उष्माघाताने नाहक जीव गमवावा लागला.
एखादा सामाजिक कार्यक्रम घ्यायचा असेल, तर हजार परवानग्या घ्याव्या लागतात. तसेच, काही दुर्घटना घडल्यास आयोजकांवर गुन्हे दाखल केले जातात. तोच न्याय कालच्या घटनेबाबत लागू होतो. त्यामुळे आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सतीश काळे यांनी दिला आहे.