वाल्हे(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : सध्या असलेले ढगाळ हवामान तसेच वाढत्या थंडीचा मोठा फटका अंजीर बागांना बसत आहे. परिणामी, अंजीर बागायतदार संकटात सापडला आहे. वातावरणातील बदलामुळे, अंजीर पिकावर करपा, तांबेरा आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. फळे पिवळी पडून गळू लागली आहेत. अंजीर जागेवर उकलू लागल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. ढगाळ हवामानामुळे फळातील गोडीही कमी होत आहे. ढगाळ हवामानामुळे एकाच वेळी क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन निघत आहे. परिणामी, बाजारभावात मोठी घसरण झाली आहे.
वाल्हेनजीक आडाची वाडी परिसरातील शेतकर्यांचे अंजीर हे प्रमुख पीक आहे. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अंजिराच्या फळबागा आहेत. हमखास उत्पन्न मिळवून देणारे हे पीक असल्याने याचे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेतले जाते. ऑक्टोबर महिन्यातील सलग पंधरा दिवस अतिवृष्टीनंतर आता पुन्हा बदलत्या हवामानाचा परिणाम अंजिराच्या बाजारपेठेवर झाला आहे. हजारो रुपये खर्च करूनही आर्थिक उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी वर्गात असमाधान असल्याचे सूर्यकांत पवार, आनंद पवार आदी शेतकर्यांनी सांगितले. थंडीमुळे फळाचे आकारमान व रंग येत नसल्यामुळेही त्याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे.
उत्पादक शेतकर्यांच्या अडचणी वाढल्या
अंजिराच्या उत्पन्नामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्क्यांपेक्षा अधिक घट होत आहे. अंजीर उत्पादक शेतकर्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बागांवर झालेला खर्चही निघेनासा झाल्यामुळे शेतकर्यांच्या अडचणीत भर पडून शेतकर्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याचे अंजीर उत्पादक संभाजी पवार, प्रशांत पवार आणि महेश पवार यांनी सांगितले.