पेठ (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : सातगाव पठार भागात सतत ढगाळ वातावरणामुळे शेतकर्यांच्या शेतातील आंब्यांच्या आलेल्या बहरावर परिणाम होत आहे. आंब्याचा मोहोर गळण्याची दाट शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. परिणामी आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सातगाव पठार भागात अनेक शेतकर्यांनी आपल्या शेतात व शेताच्या कडेला विविध जातीचे कलमी आंबे घेतले आहेत. सतत ढगाळ वातावरणामुळे आंब्यांचे आलेले मोहोर गळायला लागले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातुर बनला आहे.
कारेगाव, भावडी, पेठ, पारगाव आदी परिसरात असंख्य आंब्यांची कलमी जातीचे झाडे आहेत. पूर्ण वाढ झालेल्या व पूर्ण बहर आलेल्या आंब्यांचा बहर गळून पडत आहे. परिणामी शेतकरी हतबल झाला आहे. खराब हवामानामुळे आंब्याच्या झाडावर कीटक घोंगावत आहेत. बहर नष्ट झाला तर आंब्यांचे उत्पादन घटणार आहे. ज्या झाडाला चांगली फळे लागणार त्याला ढगाळ वातावरणामुळे बाधा निर्माण होत आहे, अशी माहिती थुगाव येथील शेतकरी वसंत एरंडे व विकास एरंडे यांनी दिली.