पारगाव; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात ढगाळ हवामानाचे सावट निर्माण झाले आहे. ढगाळ हवामानामुळे आंब्याच्या झाडांना आलेला मोहोर गळून जाण्याची भीती आंबा उत्पादक शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. अनेक शेतकर्यांच्या बांधावर आंब्यांची विविध जातींची झाडे आहेत. नोव्हेंबर महिन्यात या आंब्यांच्या झाडांना मोहोर येण्यास सुरुवात होते. सध्या आंब्याच्या झाडांना मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे, परंतु गेली दोन-तीन दिवसांपासून या परिसरात ढगाळ हवामानाचे सावट निर्माण झाले आहे.
तुरळक ठिकाणी हलका पाऊसदेखील पडला. ढगाळ हवामानामुळे आंब्यांना आलेला मोहोर गळून जातो. तसेच तुडतुडे, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आंब्यावर होतो. उत्पादनावर देखील परिणाम होतो. आंबा पिकातून शेतकर्यांना दरवर्षी चांगले अर्थार्जन होते, परंतु गतवर्षीही डिसेंबर महिन्यामध्ये ढगाळ हवामान निर्माण होऊन अवकाळी पाऊस पडला होता. त्याचा परिणाम आंब्यावर मोठ्या प्रमाणावर झाला होता. यंदा तीच परिस्थिती उद्भवल्याने आंबा उत्पादक शेतकर्यांनी चिंता व्यक्त केली आहे.