खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडव्याला राजगड, सिंहगड, मावळ खोर्यातील बांबू विक्रीतून जवळपास एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली. सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक, पाषाण, वारजे, तसेच शहर उपनगरांतील या बांबूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यामुळे दुर्गम भागातील शेतकरी, मजुरांना रोजगार मिळाला. तोरणा, राजगड, पानशेत इत्यादी डोंगरी पट्ट्यातील बांबूला गुढीपाडव्यासाठी बाजारपेठेत दर वर्षी मोठी मागणी आहे. वरसगाव धरण खोर्यातील तव येथील बांबूचे व्यापारी लालासाहेब पासलकर म्हणाले, 'गेल्या आठ दिवसांत परिसरात बांबूंची जवळपास दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
' तोरणा खोर्यातील घेवडे येथील बांबू उत्पादक शेतकरी शिवाजी कडू म्हणाले, 'इमारतीवर उंच गुडी उभारता येत नाही. त्यामुळे नागरिक सदनिकांच्या गॅलरीवर कमी उंचीच्या बांबूच्या गुढी उभारतात. त्यासाठी पाच ते दहा फूट उंचीच्या बांबूंच्या तुकड्यांना मोठी मागणी होती.'तीस रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत उंचीनुसार एका बांबूची किंमत होती. पुण्याच्या पश्चिमेला असलेल्या मावळ खोर्यात मेसी, ढोपील, चिवली, उडा, माणगा, तारापुरी अशा पारंपरिक जातीच्या बांबूचे उत्पादन होते. गुढीपाडव्याच्या सणाबरोबर वर्षभर बांबूला शेती, इमारत बांधकाम आदी कामांसाठी बांबूना मागणी आहे.
शेवटच्या टोकापर्यंत पक्के रस्तेही अनेक ठिकाणी झाले आहेत. त्यामुळे स्थानिकांना बारमाही रोजगार मिळाला आहे. मावळातील बांबू सरळ, जाड, टिकाऊ, दर्जेदार असल्याने कलात्मक वस्तू, सुशोभीकरणासाठी अलीकडच्या काळात देशभरात मागणी वाढली आहे.