पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी महायुती सरकारने अर्थसंकल्पारम्यान योजनांचा पाऊस पडला. या योजनांमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अधिक लोकप्रिय झाली. या योजनेवरून विरोधकांनी लाडक्या भावाला काय? असा प्रश्न उपस्थित करत, विरोधकांनी सरकारच्या योजनांचा अपप्रचार केला. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून वारंवार फेक नरेटिव्ह रचलं चातंय, असा आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे. यावरून तुमच्या मते फेक नरेटिव्ह म्हणजे काय? असे सवाल शरद पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने या संदर्भातील X पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, संविधान बदलण्यासाठी आम्हाला ४०० खासदार हवे आहेत, अशी वक्तव्य भाजप नेत्यांनी केली होती, हे खोटे आहे का? असा सवाल पवार गटाने देवेद्र फडणवीस यांना केला आहे.
केंद्र सरकारने पोलिस बळाचा वापर करून देशातील शेतकरी आणि कामगारांवर काळे कायदे लादले. मणिपूरमधील हिंसाचारात महिलेची नग्न धिंड काढली जाते. किरीट सोमय्या यांनी भावना गवळी, रवींद्र वायकर, हसन मुश्रीफ अशा महायुतीच्या डझनभर नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांच्यावरील कारवाईचं काय झालं ? राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि वाढती गुन्हेगारी या घटनांना तुम्ही फेक नरेटिव्ह म्हणणार का?, असा सवाल देखील शरद पवार गटाकडून फडणवीस यांना विचारण्यात आला आहे.
राजकीय स्वार्थासाठी वास्तव गोष्टींना फेक नरेटिव्हचं लेबल लावणं बंद करा. महाराष्ट्रविरोधी, संविधानविरोधी कृत्यांवर कितीही पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला तरी या ढोंगीपणाला महाराष्ट्रातील जनता मुळीच भुलणार नाही. उलट तुमच्या नरेटिव्ह आधारित स्वार्थी राजकारणाला येत्या विधानसभा निवडणुकीत जनता चांगलाच धडा शिकवेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने घेतला आहे.