पुणे : सरकार कोणाचेही असो आणि सरकार कुठलेही असो महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी काय केले, हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. केवळ शिवाजी महाराजांसारखे महापुरुष आणि गड-किल्ल्यांची नावे घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हेच सुरू आहे, अशी खंत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली. एका कार्यक्रमानिमित्त छत्रपती संभाजीराजे बोलत होते. या वेळी ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक दुर्गमहर्षी प्रा. प्र. के. घाणेकर, ए.सी.पी. सुरज गुरव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, बिनतारी संदेश विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, वनविभागाचे उप-वनसंरक्षक राहुल पाटील, राज्य उत्पादन शुल्क, पुणेचे अधीक्षक चरणसिंह राजपूत, अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे आणि पुरातत्त्व संशोधक सचिन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
संभाजीराजे म्हणाले, 'सरकारने आणलेली दत्तक योजना ही केवळ पर्यटनापुरती मर्यादित आहे, तर संवर्धन आणि जतनासाठी नाही. आमच्या दृष्टिकोनातून गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन हे प्राधान्यक्रमावर असून, पर्यटन हे दुसर्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले हे आपल्या अस्मितेचा भाग असून, आम्हाला तिथे राजस्थानमधील गडकिल्ल्यांवर असलेली 'संस्कृती' आणायची नाही. महाराष्ट्रातील गड-किल्ले हे आत्मचिंतन आणि महाराजांचे विचार आत्मसात करण्याचे स्थळ आहे."