![बाणेर-बालेवाडीमधील पाणीटंचाई दूर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F11%2Fdownload-1-23.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
बाणेर; पुढारी वृत्तसेवा : बाणेर-बालेवाडी परिसरातील पाणीटंचाई तातडीने सोडविण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. बालेवाडी गावठाण भागात गेल्या आठवडाभरातून चार ते पाच दिवस पाणीच आले नव्हते, तर इतर भागांमध्ये अनियमित व कमी दाबाने येत असलेल्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
वारंवार तक्रार करून अधिकार्यांना सांगून फोन करून काहीच फरक पडत नसल्याचेही या वेळी नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परिसरातील पाणीटंचाईसंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देऊन ही समस्या मांडण्यात आली.
पाणी टाकीवरील नादुरुस्त झालेले वॉल दुरुस्त करण्यासह विद्युत पंप नवीन बसविण्याची व पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना या वेळी आयुक्तांनी संबंधित अधिकार्यांना केल्या. तसेच, पाणी वेळेवर सोडण्याची ताकीद त्यांनी अधिकार्यांना केल्याची माहिती संघटनेचे प्रकाश बालवडकर यांनी दिली. या प्रसंगी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, आनंदराव कांबळे, पोलिस पाटील दिलीप बालवडकर, गणेश कळमकर, हनुमंत बालवडकर आदी उपस्थित होते.