पुणे; पुढारी वृत्तसेवा : ही 1966 सालची गोष्ट आहे. त्या वेळी मला तत्काळ टेलिफोनची गरज होती. मात्र, तो मिळण्यास चक्क सहा वर्षे वाट पाहावी लागली. पण, आता तंत्रज्ञान किती प्रगत झाले आहे. मोबाईल क्षणार्धात मिळतो. मात्र, अजूनही इंडिया आणि भारत यात मोठी दरी आहे, त्याचे दर्शन कोरोनात झाले, अशी खंत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली.
उद्योजक डॉ. गणेश नटराजन यांच्या जी. टी. टी. फाउंडेशनच्या वतीने उद्योजकता इनोव्हेशन अॅवॉर्डस या कार्यक्रमाचे आयोजन मराठा चेंबर्सच्या मूळगावकर सभागृहात करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर बोलत होते. ते म्हणाले की, तंत्रज्ञानात एकेकाळी आपला देश खूप मागे होता. 1966 साली मी टेलिफोन बुक केला, तो येण्यासाठी मला सहा वर्षे वाट पाहावी लागली होती. मात्र, आज जो बदल झालाय त्याचे कारण तंत्रज्ञान हे आहे.
अजूनही भारत आणि इंडियात मोठी दरी आहे, याचे दर्शन कोरोनात दिसले. कोरोना काळात एका 15 वर्षांच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. कारण तिला इंटरनेट उपलब्ध झाले नाही. तिचा शाळेचा अभ्यास बुडत होता म्हणून तिने जीवन संपवले. आपल्या देशात सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, असे माझे मत आहे. गरीब – श्रीमंत, शहर आणि खेडी असा भेद अजून आहे. तो मिटला तरच आपण महासत्तेच्या दिशेने जाऊ. या कार्यक्रमात गणेश नटराजन व त्यांच्या पत्नी उमा नटराजन यांचेही भाषण झाले.