पुणे : पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, शहरासह जिल्ह्यातदेखील ज्या ठिकाणी प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन शाळा भरत आहेत, त्या ठिकाणी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होतो आणि माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना उन्हाचा तडाखा लागत नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 च्या पार गेला आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने विद्यार्थी, नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परीषदेच्या सर्व शाळा 1 एप्रिलपासून सोमवार ते शनिवारी सकाळी साडेसात ते साडेअकरादरम्यान भरविण्यात याव्यात, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिले आहेत, परंतु हा निर्णय केवळ जिल्हा परिषदेच्या शाळांपुरताच मर्यादित ठेवला आहे.