इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या त्यामधील 19 ग्रामपंचायतींमध्ये निर्विवाद भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. तीन ग्रामपंचायती संमिश्र आल्याचा दावा माजी सहकारमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला. यापुढे होणार्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या या सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इंदापूर येथे 19 ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रा. पं. सदस्यांसह उर्वरित ग्रामपंचायतींमधीलही भाजपच्या निवडून आलेल्या ग्रा. पं.सदस्यांचा सत्कार हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रभावीपणे करावे. या निवडणुकीच्या निकालातून भाजपचे इंदापूर तालुक्यावरील निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे.
प्रास्ताविक इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अॅड.शरद जामदार यांनी केले. या वेळी पृथ्वीराज जाचक, अॅड. कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोडे, मारुती वणवे, डॉ. लक्ष्मण आसबे, नूतन सरपंच मयूरी जामदार आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी, तर इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी आभार मानले.