पुणे : पुढारी वृत्तसेवा : सध्या जगात चीन व अमेरिकेत पॉवर पॉलिटिक्सची स्पर्धा सुरू आहे. अशा वेळी त्यांना शह देण्यासाठी आपण रामायण-महाभारतातील कूटनीतीचा वापर परराष्ट्र धोरणात का करू नये? तसेच या पूर्वीच्या राजकारण्यांनी राबविलेल्या अलिप्ततावाद भूमिकेने फार काही साध्य झाले नाही, असे मत परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी पुण्यात एका चर्चासत्राचे उद्घाटन करताना व्यक्त केले.
येथील सिम्बायोसिस विद्यापीठाच्या वतीने भारताची धोरणात्मक संस्कृती या विषयावर आंतराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन डॉ. जयशंकर यांनी केले. या वेळी व्यापीठावर सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरू डॉ. रामकृष्ण रमण, प्रकुलगुरू डॉ. विद्या येरवाडकर यांची उपस्थिती होती.
डॉ. जयशंकर म्हणाले, एकेकाळी भारत जगातील अतिप्रगत आणि प्रचंड शक्तिमान राष्ट्र होते.
रामायण, महाभारत काळ हे त्याचे उदाहरण आहे. राम, कृष्ण, हनुमानापासून कौटिल्य ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतच्या महापुरुषांनी आपल्याला मुत्सद्दी परराष्ट्र धोरणाचे धडे दिले. त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. तसेच त्याचा उपयोग परराष्ट्र धोरणात केला पाहिजे. आपल्या देशात श्रीकृष्ण आणि हनुमान हे परराष्ट्र धोरण राबवणारे उत्तम मुत्सद्दी होऊन गेले.
जयशंकर यांनी देशाचे माजी पंतप्रधान पंडित नेहरू व देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्यात त्या काळात देशाच्या सांस्कृतिक धोरणावरून असलेल्या मतभेदाचा ओझरता उल्लेख केला. पंडित नेहरू व सरदार पटेल यांच्यात या विषयावर एकमत नव्हते. नेहरू हे पटेलांना प्रतिसाद देत नसत. परराष्ट्र धोरण तयार करताना फक्त काँग्रेस पक्षाचे योगदान असल्याचे बोलले जाते. मात्र यात अनेकांनी हातभार लावला, असेही त्यांनी नमूद केले. अलिप्ततावाद ही भूमिका राबविण्यात आली. मात्र त्याचा फार फायदा भारताला झाला नाही.
ब्रिटिशांनी भारतीय संस्कृतीची ओळख पुसून टाकण्याचेच काम केले. आपल्यावर ग्रीक संस्कृतीसह अनेक संस्कृतीचे आघात झाले; पण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संस्कृतीची खरी ओळख पुन्हा एकदा ताकदीने करून दिली, ती स्वामी विवेकानंद आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी. भारतातील राजे-महाराजे यांनीही आपली संस्कृती जपली. यात छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजांचे मोठे योगदान असल्याचे जयशंकर यांनी नमूद केले.
हेही वाचा