

मंचर: आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील सुमारे 42 गावांना ऐन उन्हाळ्यात हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजवा कालव्याचे आवर्तन सुरू झाले आहे. यामुळे शेतकरी आणि ग््राामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाढत्या उन्हामुळे शेतीपिकांवर ताण निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटण्याची भीती निर्माण झाली होती. त्याचबरोबर काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाईही जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली होती. आता माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुचनेनुसार उजवा कालव्यातून सोडण्यात आलेले आवर्तन महत्त्वाचे ठरले आहे.
कालव्याचे पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना उभी पिके वाचविण्यास मदत होणार आहे. भाजीपाला, फळबागा तसेच उन्हाळी पिकांना आवश्यक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक भागांत विहिरी व पाणीसाठे कमी झाल्याने कालव्याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत होते.
स्थानिकांच्या मते, हे आवर्तन केवळ शेतीसाठीच नव्हे, तर ग््राामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरही तात्पुरता दिलासा देणारे ठरणार आहे. वेळेवर पाणी उपलब्ध झाल्यास उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही टाळता येईल.
यंदा उन्हाची तीवता मोठी असल्याने पिकांना पाण्याची गरज वाढली होती. उजवा कालव्याचे आवर्तन सुरू झाल्याने उभी पिके वाचण्याची आशा निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न काही प्रमाणात सुटेल.
रमेशशेठ लबडे, उद्योजक, जारकरवाडी