

लोणी काळभोर: मुख्यमंत्र्यांच्या, महसूलमंत्र्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत बदली ठिकाणी न जाता कोणी मंत्री खासगी सचिव, विशेष कार्यधिकारी म्हणून घेईल का? भले त्यासाठी कारकुनाचे पद उन्नत करून घेतले तरी चालेल; पण आम्हाला मंत्री आस्थापनेवर घ्याच, अशी शक्कल खानदेश, विदर्भ, मराठवाड्यात बदली झालेल्या काही माहीर उपजिल्हाधिकाऱ्यांनी लढवली आहे.
महसूल व वन विभागाने राज्यातील जवळपास दीड डझन उप जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रदीर्घ काळापासून प्रतिनियुक्तीवर ठाण मांडलेल्या, पुणे आणि मुंबईत वर्षानुवर्ष काम केलेल्यांच्या बदल्या खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात केल्या आहेत, मात्र यातील काही माहीर उपजिल्हाधिकाऱ्यांनी लगेचच त्या भागात जावे लागू नये. (Latest Pune News)
यासाठी मंत्री अथवा राज्यमंत्री यांच्याकडे खासगी सचिव अथवा विशेष कार्यधिकारी होता येते का, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी मंत्र्यांच्या जवळच्या लोकांना हाताशी धरून लगेच मागच्या तारखेचे पत्र तयार करून ते सामान्य प्रशासन विभागाला देण्याची तयारी केली आहे.
काही ठिकाणी खासगी सचिव अथवा विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या जागा रिक्त नसल्याने या अधिकाऱ्यांनी अशी शक्कल लढवली आहे की, मंत्री आस्थापनेवरील कारकून, टंकलेखक ही पदे उपजिल्हाधिकारी संवर्गात परावर्तित करून अथवा वर्ग करून त्या जागेवर काम करण्याची तयारीदेखील दाखवलेली आहे.
उपजिल्हाधिकारी हे पुणे-मुंबई सोडून खानदेश, विदर्भ, मराठवाड्यात जाऊ लागू नये, म्हणून कारकून टंकलेखकाच्या परावर्तित पदावरदेखील काम करायला मंत्री आस्थापनेवर तयार झालेले आहेत यावरूनच त्यांचा पुणे मुंबईवरील जीव लक्षात येतो.
एकीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातलेला असताना क्षेत्रीय पातळीवर महसुली विभागात प्रचंड रिक्त पदे असल्याने नियमित कामकाज, शेतीचे पंचनामे, भूसंपादन असे अनेक विकासात्मक कामकाज ठप्प झालेले असताना वर्षानुवर्ष पुणे आणि मुंबईमध्ये काम करण्यास सोकावलेले अधिकारी विदर्भ, मराठवाड्यात जायला तयार नाहीत याबाबत सरकारने कडक कारवाई करण्याची गरज आहे, नाहीतर ’नेहमीची येतो पावसाळा’ याप्रमाणे थोड्या दिवसात याच अधिकाऱ्यांचे सुधारित आदेश पुणे-मुंबई विभागात अथवा मंत्री आस्थापना वर झाल्यास काहीच बदललेले नाही असेच लोकांना वाटेल.