उंडवडी : बारामती तालुक्यातील जिरायती भागातील उंडवडी सुपेसह परिसरात सध्या लिंबाच्या फार कमी बागा राहिल्या आहेत. परिणामी, या परिसरात लिंबाची आवकही चांगलीच घटली असून, दरात मात्र मोठी वाढ झाली आहे. उंडवडी सुपे परिसरात आधी मोठ्या प्रमाणात लिंबाच्या बागा होत्या.
लिंबाला बाजारभावही उन्हाळ्यात चांगला मिळत असल्याने व बाजारपेठही जवळ असल्याने शेतकरी जास्तीत जास्त लिंबाची झाडे लावत होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात लिंबाला बाजारभाव नसल्याने शेतकर्यांनी झाडाची फळे तोडली नाहीत. फळे गळून पडल्याने त्याचा बागांवर दुष्परिणाम झाला. पाणीही कमी पडल्याने फळबागा जळून गेल्या. परिणामी, परिसरात लिंबाच्या बागा फारच थोड्या राहिल्या आहेत.