पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना संपल्याने बाजारात कलिंगड, खरबुजाच्या मागणीत घट झाली आहे. तर, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या फळांची मागणी कायम आहे. या फळांची बाजारातील आवक-जावक कायम असल्याने दर स्थिर आहेत. आंब्याचा हंगाम बहरात असून हापूससह कर्नाटकातून येणार्या आंब्याला चांगली मागणी आहे. त्यातुलनेत आंबा येत नसल्याने आंब्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ आहे. शेतकरीवर्गाकडून लहान तसेच कच्च्या लिंबूची तोड करून बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. बाजारात येत असलेल्या लिंबांमध्ये अपेक्षित रस नसल्याने तसेच ती कच्ची असल्याने लिंबाच्या 15 किलोंच्या गोणीमागे दीडशे ते दोनशे रुपयांनी घसरण झाली आहे. खरेदीदारांचा कल आंब्याकडे जास्त असल्याने बाजारात चिक्कू, पेरू, संत्री, मोसंबी, डाळिंब आदी फळांना साधारण मागणी आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने चिक्कूच्या भावात दहा टक्क्यांनी तसेच पपईच्या भावात किलोमागे तीन ते पाच रुपयांनी घसरण झाली आहे.
रविवारी (दि. 23) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 6 ट्रक, संत्री 5 ते 6 टन, मोसंबी 25 ते 30 टन, डाळिंब 20 ते 25 टन, पपई 10 ते 15 टेम्पो, लिंबांची सुमारे 1 हजार 700 ते 2 हजार 200 गोणी, कलिंगड 30 ते 40 टेम्पो, खरबूज 20 ते 25 टेम्पो, पेरू 600 ते 700 क्रेट्स, चिक्कू दिड ते दोन हजार डाग, हापूस आंबा दोन हजार पेटी इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 700-1500, मोसंबी : (3 डझन) : 280-400, (4 डझन) : 100-220, संत्रा : (10किलो) : 400-1200, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 50-200, गणेश : 10-40, आरक्ता 20-60, कलिंगड : 5-12, खरबूज : 10-25, पपई : 5-15, अननस (एक डझन) : 100-500, पेरू (वीस किलो) : 300-400, चिक्कू (दहा किलो) : 100-400, आंबा : रत्नागिरी हापूस : कच्चा 5 ते 9 डझन : 2500-4500 तयार 3000-5000. कर्नाटक : कच्चा हापूस (1 डझन) 300-500 (1 किलो) 80-100, पायरी (1 डझन) 200-300 (1 किलो) 40-60, लालबाग (1 किलो) 30-50, बदाम(1 किलो) 30-55.