उमेश कुलकर्णी
दौंड: दौंड नगरपालिकेची नवीन प्रभागरचना नुकतीच जाहीर झाली आहे. मागील नगरपालिकेत 24 सदस्य होते; मात्र नव्या रचनेनुसार सदस्यसंख्या 26 झाली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापले असून अनेक दिग्गजांनी आपल्या प्याद्यांच्या चाली सुरू केल्या आहेत.
नगराध्यक्षपद पुरुष सर्वसाधारण वर्गासाठी राखीव असल्याने ही निवडणूक अधिक प्रतिष्ठेची होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या वेळी चौरंगी लढत होण्याची शक्यता असली तर ऐनवेळी भाजप काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Latest Pune News)
या निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, माजी नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे, तसेच नव्याने स्थापन झालेल्या दौंड शहर विकास आघाडीचे नंदुभाऊ पवार या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत भाजपसमोर मात्र मोठा पेच उभा आहे. पक्षाने स्वतःचे पॅनेल उभे करावे की मित्रपक्षांबरोबर युती करावी, हा प्रश्न कायम आहे. याचे कारण म्हणजे विद्यमान आमदार राहुल कुल यांचे निकटवर्तीय प्रेमसुख कटारिया यांनी जर स्वतंत्र पॅनेल उभे केले तर भाजपची अडचण वाढू शकते.
सध्या तरी कुल-कटारिया एकत्र असले तरी आगामी निवडणुकीमध्ये दोघेही काय भूमिका घेतात हे पाहणे गरजेचे आहे. प्रेमसुख कटारिया चाणक्य, हुशार, अनुभवी व राजकारणी आहेत त्यामुळे शेवटच्या क्षणी ते कोणता निर्णय घेतात यावर सर्व काही अवलंबून आहे.
कुल-कटारिया एकत्र झाले तर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंद्रजित जगदाळे यांच्यात चुरस होईल प्रत्येक पक्षाच्या पदाधिकार्यांनी चाचणी सुरू केली आहे. कोणाला आपल्याकडे वळवता येईल याकडे सर्वच नेते मंडळींचे डाव सुरू आहेत.
युतीचा खेळ अजून धूसर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (उबाठा) व मनसे हे पक्ष स्वतंत्र पॅनेल उभे करतील की युतीचा मार्ग निवडतील, हे स्पष्ट व्हायचे आहे. भाजपची ताकद वाढलेली असली तरी अंतर्गत धुसफूस उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
विकास निधीवरून नाराजी
मागील काही वर्षांत शहर विकास निधीतून मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी बगलबच्च्यांच्या माध्यमातून उधळल्याचा राग मतदारांमध्ये असल्याचे बोलले जाते. जनतेचा हा असंतोष मतदान पेटीतून प्रकट होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
पोलिस प्रशासनाची कसोटी
निवडणुकीच्या काळात पोलिस यंत्रणेचा राजकीय हेतूसाठी वापर होण्याची शक्यता वर्तवली जाते. खोट्या तक्रारी, गुन्हे दाखल करणे, महिला वर्गाचा राजकीय उपयोग करणे असे प्रकार घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे; अन्यथा निवडणूक काळात गोंधळ अपरिहार्य होऊ शकतो.
निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे
प्रभागसंख्या : आता 24 वरून 26
नगराध्यक्षपद : पुरुष सर्वसाधारण राखीव
मुख्य स्पर्धक : प्रेमसुख कटारिया, इंद्रजीत जगदाळे, नंदुभाऊ पवार
भाजपचा पेच : स्वतःचे पॅनेल की युती?
विकास निधीवर नाराजी : निकृष्ट कामांमुळे नागरिक असंतुष्ट
पोलिसांची जबाबदारी : निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे