![शिर्सुफळ येथील दत्तवाडी पाणी योजना बंद; विद्युत रोहित्र बंदचा नागरिकांना त्रास](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F07%2F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A4%BE.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
उंडवडी; पुढारी वृत्तसेवा: शिर्सुफळ (ता. बारामती) येथील दत्तवाडी पाणीपुरवठा योजना जवळपास एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे येथील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागली आणि हिवाळ्यातदेखील हीच परिस्थिती आहे. या भागातील डीपीवरील विद्युत उपकरणे बंद झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात वारंवार संबंधित विभाग व ग्रामपंचायत यांना सांगूनही आजतागायत कोणच दखल घेत नसल्यामुळे ही वेळ आल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
खंडोबानगर, गावठाण या ठिकाणी पाणीपुरवठा बंदमुळे ऐन सणासुदीत पाण्यासाठी इतरत्र फिरावे लागत आहे. त्यात वेळेवर लाईटबिले भरूनही महावितरण दखल घेत नसेल तर याला जबाबदार कोण, असा सवाल येथील नागरिक करत आहेत. ऐन पावाळ्यात विहिरीत पाणी असतानादेखील शिर्सुफळ दत्तवाडी पाणीपुरवठा योजना एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. वीज कंपनीचा हलगर्जीपणा यामध्ये कारणीभूत आहे. लवकरात लवकर रोहित्र बसवण्यात यावे, असे मत नागरिकांनी मांडले आहे.