खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: धायरी परिसरातील रायकरमळा, बेनकरवस्ती आदी परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर पथदिव्यांचे खांब उभे आहेत. मात्र, बहुतांश खांबांवर दिवेच नाहीत. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळेस अंधारातूनच मार्गस्थ व्हावे लागत असून, अनेक महिन्यांपासून ही परिस्थिती तशीच आहे. दुसरीकडे प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. पथदिव्यांच्या खांबांवर दिवे नसल्याने तसेच काम अर्धवट अवस्थेत असल्याने पालिकेचे अधिकारीही अचंबित झाले असून, याबात पालिकेच्या विद्युत विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
याबाबत सिंहगड रोड क्षेत्रिय विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड म्हणाले, 'धायरी येथील या प्रकराची माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावरील पथदिव्यांचे काम कधी झाले, किती काम अर्धवट आहे, किती खांबांवर दिवे नाहीत याबाबत विद्युत विभागाकडून माहिती घेतली जात आहे.' परिसरातील पथदिव्यांच्या जवळपास सर्वच खांबांना चंदेरी रंग देण्यात आला आहे. मात्र या खांबांवर मात्र दिवे बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे परिसर अद्यापही अंधारात आहे, याकडे धनंजय बेनकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.