

पिंपरी(पुणे) : पुढारी वृत्तसेवा : जंठानगर परिसरातील अनेक ठिकाणचे विद्युत रोहित्र उघडे पडले आहेत. रोहित्रांना दरवाजे नसल्याने विद्युत तारांचे जाळे उघड्यावरच आहे. या उघड्या तारांना एखाद्या व्यक्तीचा अनवधानाने स्पर्श झाल्यास दुर्घटना घडू शकते.
महावितरणकडून पुरविला जाणारा विद्युत पुरवठा हा उच्च दाबाचा असतो.
त्यामुळे शहरात जागोजागी ट्रान्सफार्मर आणि विद्युत रोहित्र बसविले जातात. त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम महावितरणचे असते. मात्र, लोकवस्तीच्या बर्याच ठिकाणी रोहित्रांना झाकणे नाहीत. त्यातून वायरिंगचे जाळे बाहेर पडलेले आहे. सध्या उन्हाळी सुट्यांचे दिवस आहेत. मुले रस्त्यावर मिळेल तिथे खेळतात. तसेच रहिवाशांचादेखील वावर असतो.
अंजठानगर येथील भागात दोन ठिकाणी रोहित्राजवळ इमारती असून आसपासच्या परिसरामध्ये विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. या विद्युत वायरिंग इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की, त्यांचे जाळे तयार झाले आहे. त्यामुळे रोहित्राला झाकण असूनही ते लावता येत नाही. वायरिंगचे जाळे इतके भयानक दिसत आहे त्याच्याजवळ जाण्याचे कोणाचेही धाडस होणार नाही. या सर्वांकडे महावितरण अधिकार्यांचे दुलऱ्क्ष असून रहिवाशांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.
शहरात अधूनमधून अवकाळी पाऊसदेखील पडत असतो, अशावेळी वारा आणि वादळ यामुळेदेखील धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशी धोकादायक ठिकाणी महावितरणकडून योग्य ती कार्यवाही करत सदरची ठिकाणी नागरिकांसाठी निर्धोक करावीत, जेणेकरून नागरिकांना त्या ठिकाणाहून ये-जा करणे त्रासदायक होणार नाही.
धोकादायक असलेल्या रोहित्रांची आम्ही लवकरच दुरुस्ती करून
घेणार आहोत.– उमेश कवडे,अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण