धरण, पाणवठे, सह्याद्रीची वनसंपदा धोक्यात

धरण, पाणवठे, सह्याद्रीची वनसंपदा धोक्यात

वेल्हे : सिंहगड किल्ल्यावर प्लास्टिकला मनाई आहे. असे असले तरी खाद्यपदार्थ विक्रेते, तसेच दररोज हजारोंच्या संख्येने येणारे पर्यटक आणलेल्या पाण्याच्या बाटल्या, पिशव्या गडावरच फेकत आहेत. त्यामुळे गडावर कचर्‍याची समस्या गंभीर बनली आहे. या वाढत्या कचर्‍यामुळे धरण, पाणवठे, सह्याद्रीची वनसंपदा धोक्यात आली आहे. सिंहगड, पानशेत व खडकवासला धरण परिसरात हॉटेल, फार्महाऊस, रिसॉर्टचे मोठे जाळे पसरले आहे. पुणे-पानशेत, सिंहगड रस्ता परिसरात एक हजाराहून अधिक हॉटेल, ढाबे आहेत. हॉटेल व्यावसायिक तसेच ये-जा करणारे नागरिक रातोरात कचर्‍याची पोती रस्त्यावर फेकून पसार होत आहेत. त्यामुळे खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयासमोरील पानशेत रस्त्याला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खानापूर ते मालखेडपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचर्‍याचे ढीग साठले आहेत.

राजगड किल्ल्यावरही अलीकडच्या काळात प्रचंड संख्येने पर्यटक गर्दी करत आहेत. पूर्वी सुट्टीच्या दिवशी शेकडोंच्या संख्येने पर्यटक येत असत. आता ही संख्या चार-पाच हजारांहून अधिक झाली आहे. पुरातत्व विभागाने गडावर खाद्यपदार्थ विक्रीला मनाई केली आहे. मात्र, पाण्याच्या बाटल्या, भेळ, लिंबू सरबत, दही, ताक, बिस्किटे आदी पदार्थांची विक्री सुरू आहे. विक्रेते गडाच्या तटबंदी, बुरुजाखाली रिकाम्या बाटल्या, पिशव्या, कचरा फेकत आहेत. त्यामुळे संजीवनी माची, पद्मावती माची, राजसदरेच्या परिसरात कचर्‍याचे ढीग पडले आहेत. वन विभाग, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतींनी सेवाभावी संस्था, निसर्गप्रेमींच्या सहभागातून चळवळ उभी करणे गरजेचे आहे. धरणे, पाणवठे, गडकोट, तसेच सह्याद्रीच्या निसर्गसंपदेची हानी करणार्‍या विघातक कचर्‍याची समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सिंहगडावर कचरा गोळा करून नियमित स्वच्छता केली जात आहे. खाद्यपदार्थ विक्रेत्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. सफाईसाठी सुरक्षारक्षक आहेत. सुरक्षारक्षक कचरा गोळा करून कुंड्यांत टाकतात. मात्र, गडावर स्वच्छता मोहीम राबविणारे काहीजण कुंड्यांतील गोळा केलेल्या कचर्‍याचे फोटो काढून गडावर स्वच्छता मोहीम राबविल्याचे भासवत आहेत.
                    समाधान पाटील, वनपरिमंडल अधिकारी, सिंहगड वन विभाग

राजगडावर 10 ते 12 विक्रेते आहेत. विक्रेत्यांना सूचना देऊनही ते जुमानत नाहीत. गडाच्या तटबंदीखालील खोल दरी, डोंगरात कचर्‍याचे ढिगारे मोठ्या प्रमाणात साठत आहेत. तेथील कचरा बाहेर काढणे धोकादायक आहे.
                                            बापू साबळे, पहारेकरी,  राजगड पुरातत्व खाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news