वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा: इंदापूरच्या पश्चिम भागात सलग तिसर्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. शेतीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. या परिसरातील निमसाखर, शिरसटवाडी, रणगाव, अंथुर्णे, वालचंदनगर व कळंब परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेली दोन दिवस पावसाने या परिसरास झोडपून काढले आहे. अंथुर्णे परिसरात मंगळवारी 34 तर बुधवारी 40 मिलिमीटर पाऊस झाला.
गुरुवारी पुन्हा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील शेतीत पाणी साचले आहे. त्यामुळे पिके वाया जाण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील मागास लागवड झालेली बाजरी काढणीला आली आहे. परंतु, पावसामुळे बाजरीचे मोठे नुकसान होण्याची चिन्हे आहेत. ऑगस्ट महिन्यापासून नव्याने लागवड केलेला ऊस अतिरिक्त पाण्यामुळे पिवळे पडण्याची शक्यता आहे. या परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणावर डाळिंब बागा आहेत. ज्या बागांमध्ये उन्हाळी बहार धरलेला असेल अशा बागांमध्ये बुरशीजन्य रोग बळावण्याची शक्यता आहे. द्राक्ष बागांचा छाटणी हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होतो. मात्र, पाऊस लांबल्याने द्राक्ष हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.