बावडा : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीचा शेवटचा सातवा टप्पा शनिवारी (दि. 1) पार पडल्यानंतर विविध संस्थांचे मतदारसंघनिहाय एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. या एक्झिट पोलनंतरही बारामती लोकसभा मतदारसंघात आपापल्या उमेदवाराच्या विजयावर महायुती व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अतिशय ठाम असल्याचे चित्र रविवारी (दि. 2) दिवसभर पाहायला मिळाले. दरम्यान, मतमोजणीस फक्त 24 तास उरले असून, जनतेमध्ये निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विजयी उमेदवारांबाबत एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे दावे करण्यात आले आहे. एक्झिट पोलच्या दाव्यांमध्येही साम्यता दिसून येत नाही. काही वाहिन्यांनी सुनेत्रा पवार, तर काही वाहिन्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे अंदाज केले आहे. त्यामुळे एक्झिट पोलनंतरही सर्वसामान्य जनताही कोणत्या उमेदवाराचे पारडे जड आहे, याबाबत मतमोजणीला फक्त एक रात्र शिल्लक राहिली तरीदेखील संभ्रमातच आहे.
बारामती लोकसभेची निवडणूक अतिशय चुरशीने झाल्याने, महायुती व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अनेक ठोस कारणे पटवून देत आपापल्या उमेदवाराचा 100 टक्के विजयाचा दावा करीत आहेत. महायुतीचे कार्यकर्ते विकासाच्या मुद्द्यावर, तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहानुभूतीच्या लाटेचा आधार हा निकालाच्या विजयी अंदाजासाठी घेत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये देशात 'लक्षवेधी' अशी चुरशीची लढत झाली. देशातील व जगातील प्रसारमाध्यमांवर अजूनही या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. राज्यात प्रबळ असलेल्या पवार कुटुंबांमध्येच ही निवडणूक होत असल्याने निकालासंदर्भात सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार व अजित पवार या चुलत्या-पुतण्यांमध्ये कोणाचे डावपेच सरस होतात? या निवडणुकीत जिंकण्याची सर्व आयुधे दोन्ही बाजूंकडून वापरली गेल्याने मतमोजणीचा निकाल काय येईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे मंगळवारी (दि. 4) दुपारपर्यंत मिळणार आहेत. असे असले तरी विजयी उमेदवाराचे मताधिक्य मात्र कमीच असेल, यावर एकमत आहे.
हेही वाचा