

Pune News: विधानसभा निवडणुकीत पुणे शहरासह जिल्ह्यात झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या निवडणुकीसाठी शहर काँग्रेसपुढे आव्हानांचा डोंगर असणार आहे. ही आव्हाने यशस्वीपणे पेलून शहर काँग्रेस पूर्वीचे वैभव प्राप्त करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुणे शहराच्या राजकारणावर वर्चस्व गाजविलेल्या काँग्रेस पक्षाने पुणे महापालिकेतही अनेक वर्षे एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेस पक्षाचे विभाजन होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाल्यानंतर काँग्रेसच्या वर्चस्वाला काही प्रमाणात लगाम लागण्यास सुरुवात झाली.
2007 मध्ये पुणे पॅटर्नचा प्रयोग अस्तित्वात आल्याने काँग्रेसला महापालिकेतील सत्तेपासून दूर राहावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेससोबत महापालिकेत सत्तेवर राहावे लागले. 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटेनंतर 2017 मध्ये झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणार्या काँग्रेसला केवळ 9 जागांवर विजय मिळाला. मागील दोन वर्षे तर महापालिकेची निवडणूकच झालेली नाही.
दरम्यान, दीड वर्षापूर्वी झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपवर मात केल्याने शहर काँग्रेसमध्ये नवचौतन्य निर्माण झाले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पुण्यात जरी यश मिळाले नसले, तरी राज्यात चांगले यश मिळाले. त्यामुळे काँग्रेसजनांचा आत्मविश्वास वाढला होता.
मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. वाट्याला आलेल्या शहरातील कसबा पेठ, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या तीनही विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांचा पराभव झाला. दोन मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांसह पक्षातीलच बंडखोरांचा सामना करावा लागला.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. आता विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने महापालिकेच्या निवडणुका लावकरच होतील, असे भाकीत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. विधानसभेला अपयश आल्याने महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवधनुष्य कसा पेलणार?
आगामी महापालिका निवडणूक शहर काँग्रेससाठी आव्हानांचा डोंगर घेऊन येणार आहे. विधानसभा निवडणुकीत उफाळून आलेली गटबाजी, स्वबळावर निवडणूक लढायची झाली, तर उमेदवारांची करावी लागणारी जुळवाजुळव, प्रभागरचनेवर राहणारा सत्ताधार्यांचा प्रभाव, या सर्व गोष्टींचा सामना काँग्रेसला करावा लागणार आहे. यावर मात करून निवडणुकीचा शिवधनुष्य पेलावा लागणार आहे.