

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारले जात असून, त्यासाठी 280 कोटी रुपये पाण्यात घातले. हेच 280 कोटी रुपये गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वापरले असते, तर त्यांचे संवर्धन झाले असते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक जमिनीवरच असले पाहिजे, त्यासाठी राजभवन ही योग्य जागा आहे,' असे मत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी केली आहे. संभाजी ब्रिगेडचा वर्धापन दिन 30 नोव्हेंबर रोजी नाशिक येथे होणार आहे.
त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. आखरे बोलत होते. या वेळी संघटक संतोष शिंदे, उत्तम कामठे, अविनाश मोहिते आदी उपस्थित होते. अॅड. आखरे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास लोकांसमोर आला पाहिजे. त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.
यापुढे आम्ही महाराजांची बदनामी सहन करणार नाही.'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांनी उत्तर दिलेले नाही. वर्तमान सरकारने महापुरुषांचा चालवलेला खोडसाळपणा थांबवला नाही, तर संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल, नाशिक येथील कार्यक्रमात पुढील दिशा ठरवली जाईल, असे अॅड. आखरे यांनी सांगितले.
राज ठाकरेंनी सुपारी घेतली आहे का?
हर हर महादेव चित्रपटातून खोटा इतिहास, विकृती दाखवण्याचे काम आत्ताच्या सरकारने केले आहे. राज ठाकरे सुपारी घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत आहेत का? असा सवालही अॅड.आखरे यांनी उपस्थित केला. अनेक विषयांना ते स्वतः जातीय रंग देत असतात. जातीय दहशतवाद निर्माण करण्याचे काम राज ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात दंगली घडल्या आहेत, असा आरोपही अॅड. आखरे यांनी केला.