

मांडवगण फराटा; पुढारी वृत्तसेवा : शिरूर- हवेली तालुक्यातील विविध समस्यांवर शिरूर- हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले आहे. कांद्याला मिळणार्या कमी भावावर सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात. शिरूर तालुक्यातील बिबट्याचे वाढते प्रमाण, हल्ले यावर सरकारने दिवसा वीज द्यावी, अशी मागणी आ.पवार यांनी केली. शिरूर तालुक्यात कृषी सहायकपदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असून, कृषी सहायक पदे भरण्यात यावीत.
कृषी भवन बांधण्याची संकल्पना मांडली. शेतकरी अपघात विमा, ऊस पिकासाठी हार्वेस्टरला अनुदान वाढविण्यात यावे. कांदा चाळ अनुदान वाढवावे, पीककर्जाचा परतावा मिळावा, शेतकरी अपघात योजनेत कुटुंबातील घटक म्हणून सुनेचा ही समावेश करावा, पशूसंवर्धन दवाखाने ग्रामीण भागात स्थलांतर करावेत. पुणे नगर महामार्गावर सहा पदरी पूल मंजूर आहे त्या कामास गती देण्यात यावी. शिरूर तालुक्याला गेल्या काही दिवसांपासून तहसीलदार मिळत नाही याविषयी आमदार अशोक पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
शिरूर तहसील कार्यालय इमारत रंगरंगोटीसाठी निधी देण्यात यावा, विठ्ठलवाडी ते सांगवी सांडसदरम्यान पुलाची मागणी आहे तसेच कोरेगाव मूळ येथे ही मुळा-मुठा नदीवर पुलाची मागणी केली तसेच वाघोली व उरुळी कांचन या वाढत्या शहरांची लोकसंख्या पाहता स्वतंत्र पोलिस स्टेशन निर्मिती करावी. ज्या ज्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे त्या कामाची स्थगिती उठवावी, अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी केली.