चासकमान धरण ‘ओव्हरफ्लो’

चासकमान धरण ‘ओव्हरफ्लो’

कडूस : पुढारी वृत्तसेवा :  खेडसह शिरूर तालुक्याला वरदान ठरलेले चासकमान धरण मंगळवारी (दि. 15) रात्री ओव्हरफ्लो झाले. धरणात 8.53 टीएमसी म्हणजेच शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. स्वातंत्र्यदिनी धरणाच्या तीन दरवाजांवर करण्यात आलेल्या नयनरम्य विद्युत रोषणाईने धरण नटले. दरवाजाद्वारे थोडा वेळ पाणी सोडल्याने सौंदर्यात अधिकच भर पडली. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने चासकमान धरणात येणारी पाण्याची आवक थंडावली आहे.

परंतु पाणलोट क्षेत्रात असणारे ओढे, नाले काहीसे सुरू आहेत. धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे शिरूर तालुक्यासाठी खरीप हंगामाचे पहिले आवर्तन सुरू असून, धरणातून 500 क्युसेक वेगाने, तर विद्युत विमोचकाद्वारे नदीपात्रात 350 असे एकूण 850 क्युसेक वेगाने पाणी सुरू आहे. चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून जास्त प्रमाणात येणारे पाणी तसेच पावसाचे प्रमाण बघता भीमा नदीपात्रात केव्हाही विसर्ग सोडण्यात येऊ शकतो.

यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार विसर्गामध्ये बदलही संभवू शकतो. पावसाच्या प्रमाणानुसार व पाण्यानुसार विसर्ग पुन्हा कमी-जास्त करण्याची शक्यता आहे. चासकमान धरण शंभर टक्के भरले असून, सध्या पाणीपातळी 649.40 मीटर, तर एकूण साठा 241.69 दशलक्ष घनमीटर झाला असून, उपयुक्त पाणीसाठा 214.50 दशलक्ष घनमीटर झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news