पुणे : पुढारी वृत्तसेवा : चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम अद्याप सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास आणखी दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) हाती घेण्यात आले असून, येथील उड्डाणपूल तयार केले जात आहे.
त्यासाठी उड्डाणपुलाचे खांब उभारण्यात आले असून, नियोजनाप्रमाणे लागणारे सिमेंट काँक्रीटचे गर्डर पूर्ण तयार नाहीत. तसेच हे गर्डर टाकण्यासाठी मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्याची शक्यता आहे. या मार्गावरून दैनंदिन होणारी वाहतूक पाहता झालेले गर्डर टाकण्याचे काम लवकरात लवकर करता येणे शक्य नाही, असे कदम यांनी सांगितले. सद्य:स्थितीला चांदणी चौकातील उडड्डाणपुलाचे आणि तेथील रस्त्यांचे सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ गर्डर आणि पर्यायी रस्त्यांच्या नियोजनाबाबतची कामे शिल्लक आहेत. दरम्यान, गर्डर टाकण्यापूर्वी या मार्गावरील वाहतुकीसंदर्भात दोन-दोन तासांचा बंद करण्याबाबत चाचपणी करून नियोजन करण्यात येणार आहे. मुळशीकडे जाणार्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक वळविण्यासाठी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे कदम यांनी सांगितले.