बेलसर; पुढारी वृत्तसेवा : भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार पुरंदर तालुक्यामध्ये सोमवार (दि.6) व मंगळवार (दि.7) रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे. सद्यस्थितीला पुरंदर तालुक्यामध्ये गहू , हरभरा काढणी चालू असल्याने जर या काळात पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. शनिवार (दि.4) ते रविवार (दि.5)दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
पुढील पाच दिवसांत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 16 ते 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 37 टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 15 टक्के दरम्यान राहील. वार्याचा सरासरी वेग ताशी 9 ते 14 कि.मी .दरम्यान राहील. आकाश निरभ्र ते अंशतः ढगाळ राहणार असल्याचा अंदाज प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा तथा प्रमुख कृषी हवामानशास्त्र विभाग व कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.
पुरंदर तालुक्यामध्ये सद्यस्थितीला अनेक पिके काढण्यासाठी आहेत, त्यामध्ये गहू, हरभरा, कांदा आणि इतर भाजीपाला पिकांचाही समावेश आहे. सद्यस्थितीला जर पावसाने हजेरी लावली, तर शेतकर्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, तर शेतामध्ये असलेले कांदा, डाळिंब, सीताफळ यांच्यावर या पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पाऊस झाला तर शेतकर्यांनी बुरशीजन्य औषधांची फवारणी करणे महत्त्वाचे आहे.