पुढारी वृत्तसेवा : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) मे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमातील अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षेतील राज्यातील विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
अंतिम परीक्षेच्या निकालात मुंबईतील किरण राजेंद्र सिंह आणि नवी मुंबईचा घिलमन सलीम यांनी ७९.५० टक्के गुण मिळवून संयुक्तरीत्या तिसरा क्रमांक, तर इंटरमिजिएट परीक्षेच्या निकालात अकोला येथील युग कारिया, भाईंदर येथील योग्या चंडक यांनी ८७.६ टक्क्यांसह संयुक्त द्वितीय क्रमांक, मुंबईचा हिरेश काशिरामकाने ८६.५ टक्के गुणांसह संयुक्त तिसरा क्रमांक पटकावला.
आयसीएआयने मे २०२४ मध्ये अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. नवी दिल्लीच्या शिवम मिश्राने ८३.३३ टक्के गुणांसह देशात पहिला, दिल्लीच्याच वर्षा अरोराने ८० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. तर या परीक्षेत ७४ हजार ८८७ विद्यार्थ्यांनी ग्रुप एकची परीक्षा दिली. त्यातील २० हजार ४७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
ग्रुप दोनची परीक्षा दिलेल्या ५८ हजार ८९१ विद्याथ्यर्थ्यांपैकी २१ हजार ४०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर दोन्ही ग्रुपची परीक्षा दिलेल्या ३५ हजार ८१९ विद्याथ्यर्थ्यांपैकी ७ हजार १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंटरमिजिएट परीक्षेच्या निकालात ग्रुप एकची परीक्षा दिलेल्या १ लाख १७ हजार ७६४ विद्यार्थ्यांपैकी ३१ हजार ९७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ७१ हजार १४५ विद्यार्थ्यांनी ग्रुप दोनची परीक्षा दिली होती. त्यातील १३ हजार ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
दोन्ही ग्रुपची परीक्षा दिलेल्या ५९ हजार ९५६ विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत भिवडीतील कुशाग्र रॉयने ८९.६७ टक्क्यांसह प्रथम, अकोला येथील युग कारिया आणि भाईंदर येथील योग्या चंडक यांनी ८७.६ टक्क्यांसह संयुक्त द्वितीय क्रमांक, तर दिल्लीचा मनित भाटिया, मुंबईचा हिरेश काशिरामका यांनी ८६.५ टक्के गुणांसह संयुक्त तिसरा क्रमांक प्राप्त केला.