

पुणे: आज जाहीर झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालात भारतीय जनता पक्षाला मिळालेले अभूतपूर्व यश हे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डबल इंजिन सरकारवर मतदारांनी दाखवलेला विश्वास असल्याची प्रतिक्रिया पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली. “महाराष्ट्राच्या मतदारांनी भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आणि सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून दिले. डबल इंजिनला पाठबळ दिले तर आपला विकास चांगल्या पद्धतीने होत राहील, हाच भरवसा महाराष्ट्राच्या मतदारांनी व्यक्त केला आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत देखील मतदारांची साथ ‘नरेंद्र-देवेंद्र’ या विकासाभिमुख नेतृत्त्वालाच मिळणार असल्याचे या निकालातून स्पष्ट होते,” असे मोहोळ म्हणाले.
एकूण 288 नगरपालिकांपैकी सव्वाशेहून अधिक ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष नागरिकांनी निवडून दिले. भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या राज्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे सव्वातीन हजार इतकी मोठी आहे. विरोधातील काँग््रेास, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग््रेास (शरदचंद्र पवार) या तिन्ही पक्षांच्या एकत्रित नगराध्यक्ष व नगरसेवकांची संख्या भाजपपेक्षा कैक पटीने कमी आहे. नगरपालिकांच्या निकालात भाजपला संपूर्ण राज्यात प्रचंड यश मिळाले. राज्याच्या सर्वच भागातील शहरी व ग््राामीण मतदारांनी भाजपला भरभरून मतदान केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने महाराष्ट्रात नुकताच एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. या पहिल्या वर्षातच राज्य सरकारने कल्याणकारी योजना आणि पायाभूत सुविधांचा विकास याचे संतुलन चांगल्या प्रकारे राखले.
केंद्रातील मोदी सरकारची राज्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे नरेंद्र-देवेंद्र यांचेच नेतृत्व जनहिताचे असल्याची प्रतिक्रिया मतदारांनी मतदानाद्वारे व्यक्त केल्याचे नगरपालिका निकालावरून स्पष्ट दिसते. याउलट प्रमुख विरोधी पक्षांनी आपली विश्वासार्हता पूर्णतः गमावली आहे. मनसेला तर मतदारांनी अजिबातच संधी दिली नाही.
विधानसभेतील दारूण पराभवानंतरही विरोधी पक्ष जनतेत जाण्याऐवजी जनहिताशी संबंधित नसलेल्या मुद्यांवरून भम पसरवण्याचा प्रयत्न करत राहिला. सत्तेत आल्यानंतर विकासासाठी निधी कुठून आणणार, याचे उत्तर विरोधक जनतेला देऊ शकले नाहीत. त्यामुळे जनतेने विरोधी पक्षांना सपशेल नाकारले, असे राजकीय विश्लेषक सांगतात.
नगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या अन्य नेत्यांनी नकारात्मक प्रचार टाळला. सरकारने केलेले काम आणि सत्ता आल्यानंतरचे विकासाचे व्हिजन लोकांसमोर मांडले. भाजपच्या या सकारात्मकतेला जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत देखील भाजप गेल्या अकरा वर्षांत केलेली प्रचंड विकासकामे आणि येत्या पाच वर्षातल्या शहर विकासाचे व्हिजन यावरच मतदारांचा आशीर्वाद मागणार आहे.
खासदार मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, सहकार आणि नागरी विमान वाहतूक