बावधन : पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यातील भुकूम आता अपघातांचा नवीन हॉटस्पॉट झाला आहे. पिरंगुट घाटाकडून म्हसोबा मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज तलावापर्यंत तीन किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये रस्ता प्रशस्त झाला आहे. परिणामी, वाहनचालक या परिसरात वेगाने वाहने चालवत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहेत. पिरंगुट घाटाकडून म्हसोबा मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज तलावापर्यंत रस्ता पूर्वी राज्य महामार्ग होता. आता राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे पुण्याकडून कोकणात जाणार्या अवजड वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज तलावापासून ते पापळ हॉटेलपर्यंत घाट असून, यावरून पिरंगुटकडे जाताना वाहनांचा वेग कमी असतो, तर पुण्याच्या बाजूने जाताना वाहनांचा वेग प्रचंड असतो. परिसरातील सिमेंटचा रस्ता अतिशय गुळगुळीत आणि निसरडा झाल्यामुळे या ठिकाणी बाजूच्या गटारीतील पाणी रस्त्यावर आले किंवा पीएमपीएमएल, डंपर आणि सिमेंट मिक्सरमधून सांडलेला काँक्रीटचा माल, यामुळेही अनेक दुचाकीस्वारांना आपटी खावी लागली आहे. काही दुचाकीस्वारांनी तर आपला प्राणही या ठिकाणी गमावलेला आहे. पिरंगुटकडे जाताना नेमका चढ संपताना त्या ठिकाणी वेगनियंत्रक बसविला असल्यामुळे वाहनांना त्या ठिकाणी आपला वेग कमी करावा लागत आहे. त्यामुळे अनेक वाहनचालकांचा वाहनांवरून ताबा सुटून अपघात झाले आहेत. परिसरामध्ये मुख्य रस्त्याला पांढरे रंबलिंग पट्टे मारण्याची गरज असून, त्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित होण्यास मदत होईल.