भोरमधील धरणाची सुरक्षितता रामभरोसे! जलसंपदा विभाग गाढ झोपेत

भोरमधील धरणाची सुरक्षितता रामभरोसे! जलसंपदा विभाग गाढ झोपेत

वैभव धाडवे-पाटील

सारोळा : भोर तालुक्यात पर्यटकांची वाढती संख्या पाहता जलाशयात बुडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भाटघर, वीर व निरा-देवघर जलाशयाच्या सांडव्यावर सुरक्षिततेव्यतिरिक्त इतरत्र कुठेही जलसंपदा विभाग लक्ष देत नसल्याने गुरुवारी पाच तरुणींचा जलाशयात बुडून मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. या सर्व जलाशयाची सुरक्षितता 'रामभरोसे' झाली आहे. यापूर्वी भाटघर धरणात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेक पर्यटकांचे आणि गुरुवारी फोटो काढण्यासाठी गेलेल्या पाच महिलांचा बुडून मृत्यू झाला. जलाशयाची सुरक्षितता वाढविण्याची गरज यामुळे पुन्हा समोर आली आहे. जलसंपदा विभागाने स्वत:चे बचाव पथक, गस्त पथक ठेवून तातडीची मदत उपब्लध करणे गरजेचे आहे.

जलाशयात सुरक्षिततेसाठी जागोजागी सीसीटीव्ही, धोक्याचे सूचनाफलक, जलाशय पट्ट्यातील गावोगावी जलसंपदा विभागाची सुरक्षितता समिती तयार करणे गरजेचे आहे. जलसंपदा विभाग फक्त जलाशयात पाणी किती, लाभक्षेत्राला पाणी देणे एवढेच काम करत आहे. जलाशयातील बुडीत लोकांची संख्या वाढत असल्याने आता तरी या विभागाला जाग येणार का ? अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

जलाशयाची नियमावली सगळ्यांना माहिती आहे. जलाशयाच्या पट्ट्यातील गावांच्या पदाधिकार्‍यांनी व पोलिस पाटलांनी याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांना व पर्यटकांना सुरक्षिततेची माहिती द्यावी.
अनिल चव्हाण – उपअभियंता, निरा जलसंपदा विभाग.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news