

भिगवण/इंदापूर: भिगवणमधील मुलीच्या अपहरण प्रकरणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. या तरुणीने इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर आपल्याला आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर न्यायालयाने संबंधित मुलीचा ताबा आई आणि मामाकडे देण्यासंदर्भात आदेश पारित केला.
मागील शुक्रवारी (दि. 20) बारामती सत्र न्यायालयासमोर या तरुणीने आपण आईसोबत जाणार नसून जहीर शेखसोबतच जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर बुधवारी (दि. 25) इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हीसीद्वारे या प्रकरणातील सुनावणी पार पडली. न्यायालयाने संबंधित तरुणीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काही प्रश्न विचारले. या वेळी संबंधित तरुणीने आई आणि मामासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली.
घटनेनंतर भिगवण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात जमले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग््राामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, विभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, बापूराव दडस आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला वेग दिला होता. जिल्ह्यातील विविध ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली होती.
मुलगी काय म्हणाली न्यायालयात?
अपहरणाच्या घटनेनंतर मुलगी तिला पळवून नेणाऱ्या जहीरसह बारामती पोलिस ठाण्यात हजर झाली होती. त्या वेळी मुलीची आई देखील तेथे आली होती; मात्र मुलगी आईसोबत जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे या तरुणीची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली होती. सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर बुधवारी इंदापूर न्यायालयात सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने मुलीला कोणाकडे जायचे, असे विचारले असता मुलीने आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. याप्रकरणी फिर्यादीच्या वतीने ॲड. आनंद देशपांडे यांनी मुलीची इच्छा विचारली होती. विशेष म्हणजे, यापूर्वी तिने संबंधित तरुणासोबत जाण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तिच्या भूमिकेत झालेला हा बदल प्रकरणाला नवे वळण देणारा ठरला आहे.
नेमकी घटना काय होती?
दि. 17 फेबुवारी रोजी दुपारी भिगवण येथे धक्कादायक प्रकार घडला होता. दुचाकीवरून जात असताना आई आणि भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून 21 वर्षीय मुलीला जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी झहीर हरुण शेख आणि आयान हरुण शेख (रा. शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड) या सख्ख्या भावांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.