पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्यात संगीताचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे संगीत विद्यापीठ उभारावयाचे असून त्यासाठी भारती विद्यापीठाने सहकार्य करावे , असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक खात्याचे मंत्री अमित देशमुख यांनी केले. भारती विद्यापीठाच्या ५८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषि व सहकार राज्यमंत्री तथा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, स्ट्रॅटजिक फोरसाईट ग्रुपचे संदिप वासलेकर, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, गौर गोपाल दास, आनंदराव पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, भारती विद्यापीठाला वैश्विक स्वरूप लाभले आहे. यामागे डॉ. पतंगराव कदम यांची दूरदृष्टी होती. आज जगातील नामांकित विद्यापीठ म्हणून विद्यापीठाची ओळख आहे. विद्यापीठाने साहित्य, संगीत, क्रीडा क्षेत्रात विस्तार करताना सामाजिकता जपली. विद्यापीठाने संगीत शिक्षणाच्या सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. या अनुभवाचा शासनाला उपयोग होईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणाऱ्या भारती विद्यापीठ सारख्या संस्थांना शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. विद्यापीठाने वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात कार्य करताना राज्यात विस्तार वाढवावा आणि मराठवाड्यातही ज्ञानदानाचे कार्य सुरू करावे, असेही देशमुख म्हणाले.
राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, स्व. पतंगराव कदम यांनी स्वतः प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालय आणि भारती विद्यापीठ सुरू केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी भारती विद्यापीठाने ग्रामीण भागात शाळा सुरू केल्या, मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन विद्यापीठाने पर्यावरण शास्त्राचा अभ्यासक्रम सुरू केला. देशाला घडविणारे संस्कारक्षम नागरिक घडविण्याचे काम करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी देशमुख यांच्या हस्ते विद्यापीठाच्या 'स्कुल ऑफ फिजिओथेरपी' या शाखेचे उदघाटन करण्यात आले. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापकांना डॉ. पतंगराव कदम सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.