

कडूस: खेड तालुक्याच्या पश्चिम भागाला शनिवारी (दि. 27) पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे येथील चासकमान आणि भामा आसखेड धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊ लागली. त्यामुळे चासकमानमधून 30500, तर भामा-आसखेड धरणातून 13312 असे एकूण 43812 क्युसेकने पाणी भीमा नदीत सोडण्यात आले आहे.
चासकमान धरणामधून मोठा विसर्ग करण्यात आल्याने चास-कडूस-टोकेवाडी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. तर भामा आसखेड धरणातील विसर्गामुळे धामणे-करंजविहिरे पुलावरून पाणी गेले आहे. यामुळे येथील संपूर्ण वहातूक ठप्प झालेली आहे. तर नदीकाठच्या गावांच्या स्मशानभूमींना पाण्याने वेढा घातला आहे. (Latest Pune News)
दरम्यान, दोन्ही धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम भागांत थोडीशी उघडीप वगळता धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. या पावसाने परिसरातील ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. यामुळे चासकमान, भामा-आसखेड, कळमोडी, धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे दक्षता म्हणून दोन्ही धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.