

शिवनगर: माळेगाव सहकारी साखर कारखानदारी आपल्या वाडवडिलांनी वाढवलेली कारखानदारी आहे. मात्र, अलीकडच्या काळामध्ये या सहकारी साखर कारखानदारीचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे.
त्यामुळे ‘सभासदराजा जागा हो, सहकाराचा धागा हो’, माळेगाव कारखान्याची निवडणूक म्हणजे खासगीकरणाविरुद्ध सहकारीकरणाची लढाई आहे, असे वक्तव्य माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केले. कारखाना निवडणूक प्रचार सभेत तावरे बोलत होते. (Latest Pune News)
मागील पाच वर्षांत सत्ताधारी संचालक मंडळाने कारखान्याचे वाटोळे केले असून होत्याचे नव्हते केले आहे. कारखाना कर्जबाजारी झाला असून आर्थकि संकट ओढवले आहे. कधी नव्हे ते डिस्टलरीवर तीन पट कर्ज उचलल्याचा अजब प्रकार सत्ताधारी संचालकांनी केला आहे.
सत्ताधारी संचालक मंडळाच्या अनेक चुकांमुळे कारखाना कर्जबाजारी झाला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या 13 कोटी जनतेचा अकरा वेळा अर्थसंकल्प साजरा केला असे ते सांगतात; मात्र सत्ताधारी संचालक मंडळाच्या चुकीच्या आकडेवारीवर विश्वास ठेवून संचालक मंडळाला पाठीशी घालत असतील तर ते आपलं दुर्दैव म्हणावं लागेल, असे मत तावरे यांनी व्यक्त केले.
त्याचमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत उभे असून, चेअरमनपदी विराजमान होण्याचे स्वप्न पाहात आहेत; मात्र माळेगावचे सभासद बंधू जाणकार आहेत. त्यांना खरं-खोटं समजते. सत्ताधार्यांच्या भूलथापांना ते बळी पडणार नाहीत आणि मोठ्या विश्वासाने ते खासगीकरणाच्या विरोधात लढतील आणि सहकार वाचवतील, असे तावरे यांनी नमूद केले.
कारखान्याच्या निवडणुकीची लढाई ही परिवर्तनाची लढाई आहे. ही तुमच्या, माझ्या मुलाबाळांच्या भविष्याची लढाई आहे. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून सहकारी साखर कारखानदारी वाचवली पाहिजे.
सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला गेला. मागील काही वार्षकि सभेत शेजारील अकरा गावे जोडण्याचा प्रयत्न केला गेला; मात्र सूज्ञ सभासदांनी तो प्रयत्न हाणून पाडला. असे झाले असते तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निवडणुकीचे उमेदवार जाहीर केले असते, असा आरोप तावरे यांनी केला.
मागील पाच वर्षांत सत्ताधारी संचालक मंडळाने चुकीचे निर्णय घेत सभासदांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करून तावरे म्हणाले, कारखाना कर्जबाजारी झाला आहे, वेगवेगळी देणी आणि सभासदांचे हक्काचे पैसे देण्यासाठी त्यांना पतसंस्थांच्या ठेवी रूपातील कर्ज घ्यावे लागते यासारखे दुसरे दुर्दैव कोणते.
दुसरीकडे माळेगाव कारखान्याच्या मालकीची असलेल्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेला विद्या प्रतिष्ठानशी जोडण्याचा डाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा असल्याचा आरोप तावरे यांनी केला; मात्र हा डाव देखील आपण सातत्याने उधळण्याचा प्रयत्न केला आहे.
सभासदांना आपण स्वाभिमानाची लढाई लढत आहोत आणि अशावेळी तुमच्या सर्वांची साथ सहकारमहर्षी चंद्ररावअण्णा तावरे यांना मिळाली पाहिजे. त्यासाठी कारखान्याची निवडणूक आपल्याला महत्त्वाची असून आपल्या मुलाबाळांच्या भविष्याचा तसेच आपल्या प्रपंचाचा विचार आपण केला पाहिजे, असे आवाहन तावरे यांनी केले.
बारामतीने पवार कुटुंबाला भरभरून दिले
मागील 50 वर्षांच्या कालावधीत पवार कुटुंबाला बारामतीकरांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून भरभरून दिले आहे. एवढे प्रेम देऊन देखील माळेगाव कारखान्याच्या माध्यमातून सहकार मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याची खंत सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांनी व्यक्त केली.