वाल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : टोमॅटो पिकाला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने, शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाले आहेत. टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. टोमॅटो लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. टोमॅटो पिकांची लागवड करण्यासाठी, एका एकरात नांगरणी, बेड तयार करणे, ठिंबक सिंचन, रोपे लागवड, खते, औषधे, तसेच माल परिपक्व होईपर्यंत अंदाजे एकरी एक लाख रुपये खर्च येतो. मात्र, मागील अनेक दिवसांपासून असणारे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे टोमॅटोला प्रतिदहा किलोला 50 रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
कांद्याला बाजार नसल्याने अजूनही कांदा शेतातच पडून आहे. त्यात अवकाळी पावसामुळे कांद्याचेही नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला. यामुळेच पाण्याचे प्रमाण अजून टिकून आहे. त्यामुळे शेतकर्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, सध्याचा बाजारभाव पाहता टोमॅटो बाजारात विक्रीला नेण्यापेक्षा तो फेकून देण्याची वेळ आमच्यावर आली आहे. खर्चसुद्धा वसूल होत नसल्याचे, रोहन भुजबळ यांनी सांगितले.