

पुणे: संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजनेअंतर्गत बारामती तालुक्यातील निवड झालेल्या १० गावांचा तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत विकास करण्याच्या दृष्टीने पुणे जिल्हा परिषद व सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती पंचायत समिती येथे जिल्हास्तरीय तांत्रिक मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत ग्रामपंचायतींच्या प्रतिनिधींना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गाव विकास आराखडे तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या कार्यशाळेत काटेवाडी, मोरगाव, दोरलेवाडी, पणदरे, गुणवडी, वाणेवाडी, पिंपळी, सुपे, कारंजे आणि मुरूम या १० गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीओईपी टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी गावांच्या गरजांचे वैज्ञानिक विश्लेषण (डीएनए सर्वेक्षण), जिल्हा तंत्रज्ञान सूची, तांत्रिक व्यवहार्यता अभ्यास, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची प्रक्रिया, निधी नियोजन आणि विविध विभागांतील समन्वय याबाबत मार्गदर्शन केले. तसेच स्मार्ट शेती, पाणीपुरवठा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, डिजिटल ग्रामपंचायत, ई-गव्हर्नन्स, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, अक्षय ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), ड्रोन तंत्रज्ञान, स्काडा प्रणाली आणि टेलिमेडिसिनचा ग्रामीण विकासात वापर कसा करता येईल, याची माहितीही देण्यात आली.
यावेळी गजानन पाटील म्हणाले, 'संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजना ही केवळ विकासकामांची योजना नसून, लोकसहभाग, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास यांचा संगम आहे. प्रत्येक गावाच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञानाधारित विकास आराखडे तयार करण्यात येतील. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि तांत्रिक संस्थांच्या समन्वयातून ही योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे.'
निवड झालेल्या गावांत डीएनए सर्वेक्षण
पुढील आठवड्यात निवड झालेल्या सर्व दहा गावांमध्ये डीएनए (Diagnostic Need Assessment) सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असून, त्याच्या आधारे प्रत्येक गावासाठी तंत्रज्ञानाधारित विकास आराखडा तयार केला जाईल. त्यानंतर ग्रामसभेची मंजुरी, व्यवहार्यता अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून विविध विकासकामांच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे बारामती तालुक्यातील निवड झालेली गावे तंत्रज्ञानाधारित, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचे आदर्श मॉडेल ठरतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.