बारामती; पुढारी वृत्तसेवा: परतीच्या पावसाने बारामती तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. पाऊस आता थांबल्याने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत. सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. त्यामुळे ट्रक आणि ट्रॅक्टरमधून उसाची वाहतूक सुरू आहे. खड्ड्यांमधून उसाची वाहतूक करताना वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
बारामती ते निरा रस्त्यावर कठीण पुलापर्यंत रस्त्यावर फारसे खड्डे नाहीत. मात्र, कठीणपूल ते निरेपर्यंत असलेले खड्डे बुजविण्याची गरज आहे. बारामती तालुक्यात यंदा सर्वाधिक पावसाची नोंद झाली. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. शहरासह तालुक्यात ग्रामीण भागांना जोडणार्या रस्त्यांचीही मोठी दुरवस्था झाली आहे. राज्यमार्ग व जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे रस्ते ठिकठिकाणी उखडले गेले आहेत.
साइडपट्ट्याही खचल्या आहेत. माळेगाव व वडगाव येथे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. याशिवाय वडगाव ते होळ आणि होळ ते मुरुम या रस्त्याचे काम नव्याने करण्यात येत आहे. कठीणपूल येथेही रस्त्यावर खडी पसरल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. जीवघेणे गतिरोधक, खचलेल्या साइडपट्ट्या, धोकादायक झाडे, रस्त्याच्या मधोमध पडलेले खड्डे, अशी तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था आहे. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.