

पुणे, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता काळात लाडक्या बहिणीची आठवण आली नाही. परंतु, विधानसभा निवडणूक समोर दिसल्यानंतर लाडकी बहिणी आठवली. कारण लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर त्यांना आता लाडकी बहिणीची आठवण आली आहे, अशी टीका करून दिवाळीनंतर निवडणुका लागतील, कारण लाडक्या बहिणीला आणखी एक हफ्ता मिळेल, या योजनेसाठी तरतूद केवळ निवडणुकीसाठीच केली आहे, पुढील तरतूद केलेली नाही, कारण पैसेच नाहीत, असे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ते पुण्यात आज (दि.९) बोलत होते. (Prithviraj Chavan)
ते पुढे म्हणाले की, आरटीई कायद्याप्रमाणे आरोग्याचा कायदा करण्यासाठी चर्चा काँग्रेस सरकारच्या काळात झाली होती. मात्र तो पुढे होऊ शकला नाही. आरोग्याची 100 टक्के जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे, बिल हा प्रकारच नसला पाहिजे, शासनाने करतातून ही व्यवस्था उभी केली पाहिजे. माझ्या काळात राजीव गांधी आरोग्य विमा सुरू केला होता, त्यावेळी शासकीय कंपनीला विमा काम देण्याचे ठरवले आणि तसे केलेही. खरं जर आरोग्य व्यवस्था जर सुधारायची असेल, तर प्राथमिक आरोग्य केंद्र बळकट केली पाहिजेत. खासगी दवाखान्यात हौस आणि पैसे असतील तरच जा, अशी परिस्थिती केली पाहिजे. सामान्य नागरिकांना शासनाकडून आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. पण या सरकारचे आरोग्यावरील काम कमी कमी होत गेले आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली. (Prithviraj Chavan)
2047 साली जादू करू असे म्हणत आहेत, आम्ही तर नसू, पण मोदी असतील. सरकारची केवळ जाहिरात बाजी सुरू आहे. निवडणुकीचा खर्च जनतेच्या पैशातून करायचा आहे का? शेतकऱ्यांची, बेरोजगार युवकांची फसवणूक झाली आहे. कंत्राटदारांच्या हाती सरकार गेले आहे. सरकारची अधोगती झाली आहे, प्रत्येक पदासाठी रेटकार्ड वापरलं जातं आहे. (Prithviraj Chavan)
महायुती सरकारचा विधानसभेत पराभव होणार आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या अगोदर लुबाडणूक सुरू आहे. 7 लाख कोटी सध्या राज्यावर कर्ज आहे. रस्त्याचे कंत्राट केवळ मित्रांना देण्याचे काम सुरू आहे, कामात दर्जा नाही, संसदेत पाणी गळत आहे. सरकार चालवण्यासाठी खूप कर्ज घ्यावे लागत आहे. सरकारी नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने पद भरल्या जात आहेत. केवळ पेन्शन देण्याची वेळ येऊ नये म्हणून मोदी सरकारने सैनिकाऐवजी अग्नीवर योजना आणली. आर्थिक पाहणी अहवालात देशातील केवळ 50 टक्के लोक नोकरी देण्याच्या लायकीचे आहेत. विद्यापीठांच्या कुलगुरूची निवड करताना तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे का नाही, ते अगोदर पाहिले जाते, अशी टीका चव्हाण यांनी केली. (Prithviraj Chavan)